उद्या मुंबई शहरातील व पूर्व उपनगरातील ५ टक्के पाणी कपात रद्द
महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाच्या कर्मचाऱयांनी ४ दिवसांचे काम ३ दिवसांत केले पूर्ण
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथे १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या परिरक्षणाचे काम मंगळवार, दिनांक २४ मे २०२२ ते शुक्रवार, दिनांक २७ मे २०२२ या कालावधीत हाती घेण्यात आले होते. त्यामुळे सदर कालावधीमध्ये पिसे पांजरापूर संकुल येथून होणा-या पाणीपुरवठ्यावर ४ दिवस परिणाम होणार होता.
या कामामुळे ‘ए’, ‘बी’, ‘ई’, ‘एफ दक्षिण’, ‘एफ उत्तर’, ‘एल’, ‘एम पूर्व’, ‘एम पश्चिम’, ‘एन’, ‘एस’ आणि ‘टी’ विभागात काही परिसरांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार होता.
सदर कालावधीत म्हणजेच मंगळवार, दिनांक २४ मे २०२२ ते शुक्रवार, दिनांक २७ मे २०२२ या कालावधीत दररोज सकाळी ११.०० वाजेपासून दुपारी ३.०० वाजेपर्यंत ४ तासांकरिता १) ‘एन व एस’ विभागातील पूर्वेकडील भाग, २) संपूर्ण ‘टी’, ‘एम पूर्व’ व ‘एम पश्चिम’ विभाग, ३) ‘एल’ विभागातील पूर्वेकडील भाग, ४) ‘बी’, ‘ई’, ‘एफ उत्तर’, ‘एफ दक्षिण’ आणि ‘ए’ विभागाच्या पाणीपुरवठ्यामध्ये ५ टक्के पाणी कपात करण्यात आली होती.
मात्र, पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथील १०० किलो व्होल्ट विद्युत उप केंद्राचे उप जल अभियंता श्री. प्रभाकर शिंदे, कार्यकारी अभियंता श्रीमती पल्लवी अटकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आभियंते – कामगार यांच्या प्रयत्नाने ४ दिवसांच्या परिरक्षणाची कामगिरी ३ दिवसांत यशस्वीरित्या पार पाडली.
त्यामुळे आता उद्या शुक्रवार दिनांक २७ मे २०२२ रोजी वरील विभागात होणारी ५ टक्के पाणी कपात पांजरापूर येथील अभियंता व कामगार यांच्या उत्कृष्ट कामाच्या नियोजनामुळे रद्द करण्यात आली आहे.