बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तानसा तलाव भरुन ओसंडून वाहू आगला. सध्या हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी 'विहार' तलाव दिनांक ७ जुलै २०२६ च्या रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला होता. त्या पाठोपाठ लगेचच त्याच दिवशी म्हणजे दिनांक ७ जुलै २०२६ रोजी रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी 'तुळशी' तलाव देखील ओसंडून वाहू लागला होता. तर आज सकाळी तानसा तलाव ओसांडून वाहू लागला आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आज पर्यंत तीन तलाव ओसांडून वाहू लागले आहेत.
मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ६१.९० टक्के इतका जलसाठा आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याचत तानसा धरण असून हे दगडी बांधकाम असलेल्या देशातील मोजक्या धरणांपैकी एक आहे. आज ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही १४५०८ कोटी लीटर (१४५०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे.
तानसा तलाव गतवर्षी दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला होता. तर त्याआधी दिनांक २४ जुलै २०२४ रोजी पहाटे ४.१६ वाजता, दिनांक २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर वर्ष २०२२ मध्ये दिनांक १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि सन २०२१ मध्ये दिनांक २२ जुलै रोजी पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता.