भांडुप परिसरातील उंच टेकड्यांवर वसलेल्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. मुंबईच्या बेस्ट बसच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नव्या वातानुकूलित विद्युत मिडी बसेसचा लाभ भांडुपमधील अरुंद रस्ते आणि चढ-उतार असलेल्या परिसरातील नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे गाढव नाका, साई विहार, साई हिल, नगरदास नगर, शिवाजीनगर, संभाजी चौक, वैभव चौक, टेंभीपाडा, गणेशनगर आदी भागांतील नागरिकांच्या दळणवळणाची मोठी अडचण दूर होण्याची शक्यता आहे.
भांडुपमधील अनेक भाग डोंगराळ व उंच टेकडीवर वसलेले आहेत. या परिसरातील रस्ते अरुंद असून अनेक ठिकाणी तीव्र चढ-उतार आणि वळणे आहेत. त्यामुळे मोठ्या आकाराच्या बसगाड्या या भागात चालविताना अनेक अडचणी निर्माण होतात. काही ठिकाणी मोठ्या बसेसना वळण घेण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. परिणामी, नागरिकांना त्यांच्या घराजवळील भागात नियमित बससेवेपासून वंचित राहावे लागत होते.
ही समस्या लक्षात घेऊन राजोल संजय पाटील यांनी बेस्ट प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून भांडुपच्या उंच व दुर्गम भागांसाठी लहान आकाराच्या मिडी बसेस सुरू करण्याची मागणी केली होती. केवळ पत्रव्यवहार न करता त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन आणि प्रत्यक्ष पाठपुराव्याच्या माध्यमातून बेस्ट प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले. भांडुपमधील नागरिकांना त्यांच्या परिसरातूनच सहज आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राजोल पाटील यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत बेस्टच्या ताफ्यात नव्या मिडी विद्युत बसेस दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे भांडुपच्या टेकडीवरील आणि अरुंद रस्त्यांच्या परिसरात या बसेस सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. नव्या मिडी बसेस सुरू झाल्यानंतर भांडुपमधील अनेक भागांना थेट आणि अधिक सोयीस्कर बससेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
यासोबतच लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रवाशांच्या सोयीसाठी भांडुप, विक्रोळी, मुलुंड, घाटकोपर तसेच मुंबईतील विविध भागांसाठी बेस्ट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणीही राजोल पाटील यांनी बेस्ट प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वे स्थानक आणि निवासी भाग यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ करण्यासाठी बेस्ट बससेवा वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
दरम्यान, मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने बेस्टकडून २०२७ पर्यंत बसचा ताफा वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुमारे सात हजार कोटी रुपयांच्या खर्चातून १,५०० मिडी विद्युत बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बसेस टप्प्याटप्प्याने बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असून पहिल्या टप्प्यात २५० बसेस दाखल होण्याची अपेक्षा आहे. या नव्या मिडी बसेसमध्ये अत्यंत कमी उंचीचा फ्लोअर असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग नागरिक तसेच व्हीलचेअर वापरणाऱ्या प्रवाशांसाठी त्या अधिक सुलभ ठरणार आहेत.
लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी तंत्रज्ञान, संपूर्ण एअर सस्पेंशन प्रणाली आणि वेगवान डायरेक्ट करंट चार्जिंग सुविधा या बसेसमध्ये असणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही या बसेस अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असतील. बसमध्ये ३६० अंश सीसीटीव्ही कॅमेरे, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम तसेच बॅटरी कंपार्टमेंटमध्ये आग लागल्यास ती तातडीने शोधून नियंत्रित करण्यासाठी फायर डिटेक्शन अँड सप्रेशन सिस्टीमचा समावेश करण्यात आला आहे. भांडुपमधील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न लक्षात घेऊन राजोल संजय पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या भागासाठी मिडी बसेस उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे टेकडीवरील व अरुंद रस्त्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. नव्या बसेस प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर भांडुपच्या विविध भागांतील नागरिकांना सुरक्षित, आरामदायी आणि अधिक सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे.