महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल तसेच केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची सदिच्छ भेट घेत विविध जनहिताचे प्रश्न, संसदीय कामकाज आणि विकासाशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या शिष्टमंडळात खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय दिना पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार श्रीरंग अप्पा बारणे आणि खासदार नरेश म्हस्के यांचा समावेश होता. विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करत सर्व खासदारांसह केंद्रीय मंत्र्यांशी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक संवाद साधला.
बैठकीदरम्यान महाराष्ट्रातील विकासकामे, पायाभूत सुविधा, जनहिताशी निगडित प्रश्न तसेच संसदीय कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत विचारांची देवाणघेवाण झाली. विविध लोकाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातही चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्र्यांनी शिष्टमंडळाच्या सूचनांची दखल घेत विकासाभिमुख उपक्रमांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. यानंतर शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही सदिच्छ भेट घेत संसदीय कामकाज, लोकप्रतिनिधींची भूमिका आणि संसदीय परंपरा अधिक सक्षम करण्यासंदर्भात चर्चा केली. या भेटीत संसदेतील विविध विषयांवर सविस्तर विचारविनिमय झाला.
यावेळी आंध्र प्रदेशचे खासदार कृष्णा तेन्नेटी यांचीही भेट घेत परस्पर संवाद साधला. विविध राज्यांतील विकासकामे, संसदीय सहकार्य व राष्ट्रीय स्तरावरील समन्वय या विषयांवरही चर्चा करण्यात आली. उपसभापती सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या भेटीला राजकीय व संसदीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले असून, केंद्र आणि राज्य यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या बैठका सकारात्मक आणि फलदायी ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.