छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस रेल्वेला भारतीय रेल्वेकडून मंजुरी मिळाल्यानंतर आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिवसेना पक्षाच्यावतीने तसेच कोकणवासीयांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कोकणातील लाखो प्रवाशांसाठी ही महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा मानली जात असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाल्याने कोकणवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या नियमित एक्सप्रेससाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून, प्रत्येक कोकणवासीयाच्या अपेक्षांना न्याय मिळावा, हा प्रयत्न यशस्वी ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे या रेल्वेला कोकण रेल्वे मार्गावरील तब्बल २२ स्थानकांवर थांबा देण्यात आल्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह वर्षभर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे कोकणातील नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय दिना पाटील, खासदार श्रीरंग बारणे,खासदार नरेश मस्के, खासदार नागेश पाटील अष्टीकर तसेच खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे अभिनंदन करत कोकणवासीयांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
सीएसएमटी–सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी मिळाल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या प्रवासाला नवे बळ मिळणार असून, विशेषतः सणासुदीच्या काळात होणारी गर्दी कमी करण्यास व प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्यास या निर्णयाची मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.