मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात मानाचे स्थान असलेल्या लालबाग-परळ परिसरातील प्रसिद्ध ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’चा आगमन सोहळा शनिवारी ढोल-ताशांच्या गजरात, थाटामाटात आणि ‘चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो’ अशा जयघोषात उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला लाखो गणेशभक्त, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.
स्थापनेचे १०७ वे वर्ष साजरे करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवासाठी विशेष संकल्पना साकारली आहे. यंदा गणेशमूर्तीची सजावट तिरुपती-तिरुमला येथील वेंकटेश्वर बालाजी मंदिराच्या धर्तीवर, तर मंडप परिसराची सजावट हैदराबाद येथील वेंकटेश्वर स्वर्णमंदिराच्या धर्तीवर करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा लालबाग-परळ परिसराला ‘तिरुपती’चा साज लाभणार असून संपूर्ण परिसर तिरुपतीमय झालेला पाहायला मिळणार आहे.
‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ची मूर्ती दरवर्षीच गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. यंदा मूर्तीच्या सभोवतालच्या सजावटीत विष्णू अवतार बालाजी देवस्थानाच्या संकल्पनेनुसार गरुड, कीर्तिमुख, शंख, चक्र, कर्पूरयुक्त नामम् (टिळा) आदी वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे चिंतामणी गणपतीच्या आकर्षक आणि देखण्या मूर्तीच्या प्रासादिक सौंदर्यात अधिक भर पडणार आहे.
तसेच तिरुपती बालाजी मंदिर, हैदराबाद येथील वेंकटेश्वर मंदिर (स्वर्णगिरी) आणि भुवनगिरी येथील मंदिरांच्या स्थापत्य व वास्तुरचनेच्या प्रतिकृतीही आकर्षक पद्धतीने उभारण्यात येणार आहेत. गोपुरम, दीपस्तंभ तसेच दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये आढळणाऱ्या याली किंवा व्याला या रक्षक प्राण्यांच्या प्रतिकृतींसह विविध पौराणिक रचना मंडपाच्या सजावटीत साकारण्यात येणार आहेत.
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र डिचोलकर यांनी सांगितले की, अत्यंत कल्पक विचार, उत्तमोत्तम कलाकार, कुशल कारागीर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यंदाची ही कलात्मक निर्मिती साकारली जात आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी ही सजावट विशेष आकर्षण आणि आनंदाची ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबईच्या ऐतिहासिक गिरणगाव परिसरात १९२० साली स्थापन झालेले चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे शहराच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. गिरणगावच्या कष्टकरी संस्कृतीचे प्रतीक असलेला चिंतामणी गणपती आजही सामाजिक एकता आणि भक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.