महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘मीट द मीडिया’ कार्यक्रमात माध्यम प्रतिनिधींशी विविध विषयांवर मोकळा संवाद साधला. मुंबई प्रेस क्लबमधील त्यांचा हा पहिलाच ‘मीट द मीडिया’ संवाद होता. सध्याच्या अन्नसुरक्षेसमोरील नवीन आव्हाने, खाद्यतेल, फूड कलर, चाचण्या, स्वच्छता, दूध पुरवठा तसेच शालेय स्तरावरील अन्ननियम अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मुंडे म्हणाले की, “अन्न हा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे फूड कलर, तेल, साखर आणि इतर घटकांबाबत निर्धारित मानकांचे पालन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अन्नाची गुणवत्ता तपासण्याबरोबरच स्वच्छतेलाही अधिक महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान दूध पुरवठा आणि त्यासंबंधित सध्याच्या परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली. नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत FDA सातत्याने लक्ष ठेवून असून, विविध स्तरांवर नमुने तपासणीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच शाळांमधील खाद्यपदार्थांबाबत बोलताना मुंडे यांनी अन्ननियमांचे पालन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शाळांच्या मेनूमध्ये करण्यात आलेल्या बदलांना पालक आणि मुलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने संतुलित आणि पौष्टिक आहाराला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ तयार करताना साखर तसेच इतर घटकांचा मर्यादित आणि निर्धारित प्रमाणात वापर करावा, अनावश्यक घटकांचा वापर टाळावा, असे त्यांनी सांगितले.
अन्न व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आवश्यक फूड लायसन्स घेऊन ठरवून दिलेल्या मानकांनुसार व्यवसाय करणे बंधनकारक आहे, यावरही त्यांनी भर दिला.
अंगणवाडीमध्ये दर महिन्याला पाठविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या नमुन्यांचीही तपासणी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. बालकांच्या पोषणाशी संबंधित अन्नाची गुणवत्ता राखण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले.
या संवादादरम्यान तुकाराम मुंडे यांनी आपल्या वैयक्तिक आवडी-निवडींबाबतही माहिती दिली. वाचन आणि ट्रेकिंग हे त्यांचे प्रमुख छंद असल्याचे त्यांनी सांगितले. अन्नसुरक्षेसारख्या गंभीर विषयांपासून ते आपल्या छंदांपर्यंत विविध मुद्द्यांवर झालेल्या या संवादामुळे कार्यक्रमात उत्सुकता आणि सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले.