राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक मुंबईत पार ;गणरायाच्या आगमनामुळे जनसन्मान यात्रेच्या तिसरा टप्पाचे नियोजन करण्यात आले - सुनिल तटकरे
मुंबई - जनसन्मान यात्रेचा नुकताच दुसरा टप्पा संपला असून आता तिसरा टप्पा कधी घ्यायचा याच्या नियोजनावर चर्चा झाली. शिवाय महायुतीच्या नेत्यांची जी बैठक पार पडली त्याअनुषंगाने मतदारसंघनिहाय आढावा घेणे आणि त्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
महायुतीच्या बैठकीत नेमके काय सूत्र असावे याची प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगतानाच त्यानुसार पक्षाच्या बैठकीतही चर्चा केली आहे. सध्या गणरायाचे आगमन होत असल्याने काही दिवस जनसन्मान यात्रा थांबवावी लागणार आहे. त्याकाळातही पक्षाचे जे विविध सेल आहेत त्या युवक, युवती, विद्यार्थी, महिला यांना काय कार्यक्रम देता येईल याचीही चर्चा करण्यात आल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.
अजितदादा जे बोलले त्यात आम्ही ६० जागा लढणार आहोत असा त्याचा अर्थ नव्हता. बोलण्याचा त्यांचा मतितार्थ, पक्षाने ५४ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय पक्षासोबत अपक्षही जोडले गेले आहेत व इतर पक्ष यांची सर्वांची मिळून संख्या ६० च्या आसपास होते ती धरुन तुम्ही पुढे चला असा त्या बोलण्याचा होता असेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
लोकसभेला सिटींगचे सूत्र होते. स्वाभाविकपणे २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जागा होत्या. शिवसेना व भाजप यांनी जास्त जागा लढवल्या होत्या. आता विधानसभेला निवडून येण्याची क्षमता असावी हे एक सुत्र असावे असे महायुतीच्या बैठकीत ठरले आहे असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.