आज समाजाच्या सर्वक्षेत्रातील महिलांचा आत्मविश्वासपूर्ण वावर हे महात्मा ज्योतिबा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या परिश्रमांमुळे शक्य - अजित पवार




आज समाजाच्या सर्वक्षेत्रातील महिलांचा आत्मविश्वासपूर्ण वावर हे महात्मा ज्योतिबा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या परिश्रमांमुळे शक्य - अजित पवार

मुंबई, - “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतीय समाजव्यवस्थेतून अज्ञान, अन्याय, अनीती, अंधश्रद्धा, अत्याचार, अस्पृश्यता, विषमतेसारख्या कुप्रथा नष्ट करण्यासाठी यशस्वी लढा दिला. महिलांसाठी देशातील पहिली शाळा सुरु करुन स्त्रीशक्तीसाठी शिक्षणाची दारे खुली केली. शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारात नेऊन विकासाची संधी उपलब्ध करुन दिली. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. अनिष्ट  रुढी-परंपरांविरोधात सत्यशोधक चळवळ उभारली. आज दिसणारी सामाजिक न्यायाबाबतची जागरुकता, महिलांचा सर्वक्षेत्रातील आत्मविश्वासपूर्ण वावर, देशात निर्माण झालेली प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी समाजव्यवस्था ही क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी, केलेला त्याग आणि घेतलेल्या परिश्रमांचे फळ आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

सामाजिक न्यायावर आधारीत, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ भारताचा पाया भक्कम करण्याचे फार मोठे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले” या संदेशाने देशात क्रांती घडविली. क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या साथीने त्यांनी महिलांसाठीची देशातील पहिली शाळा सुरु केली. त्यातून महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली. आज समाजाच्या सर्व क्षेत्रात पहिला आत्मविश्वासाने वावरत आहेत. महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. महिला त्यांच्या हक्कांबद्दल जागरुक झाल्या आहेत, याचे सर्व श्रेय क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी आणि हालअपेष्टांना आहे, याचा विसर पडता कामा नये. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील अज्ञान, अंश्रश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, लिंगभेदाविरोधात दिलेला लढा आणि सत्यशोधक विचारांची चळवळ पुढे घेऊन जाणे, हे त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले आहे.


Most Popular News of this Week