"शिक्षणाची इच्छा असते, पण परिस्थिती अनेकदा आडवी येते... आर्थिक अडचणींमुळे अनेक मुलं-मुलींना शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. मात्र अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी चेंबूरमधील एक प्रशिक्षण संस्था आशेचा नवा किरण ठरत आहे.
ही संस्था किमान दहावी पास किंवा आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुला-मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम करत आहे.
अवघ्या ३० ते ९० दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये ग्राफिक डिझाइन, नर्सिंग, ड्रायव्हिंग, ब्युटी पार्लर यांसारख्या अनेक रोजगाराभिमुख कोर्सेसचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, केवळ प्रशिक्षण देऊन ही संस्था थांबत नाही. विद्यार्थ्यांचे कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यानंतर प्लेसमेंटची सुविधाही दिली जाते.
मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये या संस्थेच्या अनेक शाखा कार्यरत आहेत. अनेक गरजू विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी येथील प्रशिक्षक मनापासून मेहनत घेत आहेत.
अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ही संस्था आज समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे."