राज्यातील स्टार्टअप संस्कृतीला नवी दिशा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'स्टार्टअप फ्रंटियर 1.0' या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी तरुणांना विज्ञान, संशोधन आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या बळावर देशाला विकसित राष्ट्र बनविण्याचे आवाहन केले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी "जय जवान, जय किसान, जय विज्ञान" या घोषवाक्याचा उल्लेख करत विज्ञान आणि तंत्रज्ञान हेच देशाच्या प्रगतीचे प्रमुख आधार असल्याचे सांगितले. तरुणांनी केवळ रोजगाराच्या शोधात न राहता संशोधन, नावीन्य आणि स्टार्टअपच्या माध्यमातून देशाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य सरकारकडून स्टार्टअप, कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती दिली. तरुणांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उद्योगतज्ज्ञ, गुंतवणूकदार, स्टार्टअप संस्थापक, विद्यार्थी आणि नवउद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्टार्टअप इकोसिस्टम अधिक सक्षम करण्यासाठी तसेच नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.