महाराष्ट्रातील अत्यंत नामांकित व ऐतिहासिक 'वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था' (VJTI), माटुंगा येथील मुला-मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांचा चालू असलेला छळ आणि दुरवस्थेची भीषण वास्तवता समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते ॲड. अमोल मातेले यांनी आज VJTI च्या वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पाहणीदरम्यान वसतिगृहातील गंभीर अस्वच्छता, मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आणि प्रशासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा उघड झाला आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. अमोल मातेले यांनी VJTI प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे.पाहणीदरम्यान समोर आलेले गंभीर मुद्दे व आरोप-
दूषित पाणी आणि साथीच्या आजारांचा धोका:संपूर्ण महाविद्यालयात टँकरद्वारे निकृष्ट दर्जाचे पाणी पुरवले जात आहे. बसवलेले वॉटर कूलर अस्वच्छ व बंद अवस्थेत धूळ खात पडून आहेत. दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांना डेंग्यू आणि इतर गंभीर आजारांना बळी पडावे लागत असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
खोल्यांची दुरवस्था व विजेची धोकादायक अवस्था:
एका खोलीत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबण्यात आले आहे. लाईट व फॅनची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना स्वतःच्या खर्चाने पंखे आणावे लागले आहेत. उघड्या तुटलेल्या वायरींमुळे अपघाताची टांगती तलवार असून, मच्छरदाण्यांमुळे हवा खेळती राहण्यास अडथळा निर्माण होत आहे.
स्वच्छतागृहांची दैनंदिन दुरवस्था व गरम पाण्याचा अभाव:
स्वच्छतागृहे अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आहेत. गीझरची कोणतीही सोय नसल्याने विद्यार्थ्यांना स्वतः उपकरणे आणून न्हाणीघरात गरम पाणी न्यावे लागत आहे. लॉन्ड्री व कपडे इस्त्री करण्याची कोणतीही व्यवस्था येथे नाही.लाखो रुपयांचा निधी गायब; सुविधा कुलूपबंद:जिम आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांच्या नावाखाली लाखो-करोडो रुपयांचा निधी कागदोपत्री खर्च दाखवला गेला आहे. मात्र प्रत्यक्षात या सुविधा कुलूपबंद असून विद्यार्थ्यांना वापरू दिल्या जात नाहीत. हा उघडउघड प्रशासकीय भ्रष्टाचार आहे.
अभ्यासिकांमध्ये दाटीवाटी आणि भंगाराचे साम्राज्य:मुलींच्या स्टडी रूमचा वापर राहण्यासाठी केला जात असून विद्यार्थिनींना दाटीवाटीने राहावे लागत आहे. तसेच टीव्ही आणि सामायिक कक्षांमध्ये निरुपयोगी साहित्य फेकून कचराकुंडी बनवण्यात आली आहे.उंदीर, साप आणि गळक्या छतांचा धोका:वसतिगृहात उंदरांचा सुळसुळाट, पक्षांची घाण आणि छताचे लिकेज यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. झाडी आणि अस्वच्छतेमुळे वसतिगृह परिसरात साप निघण्याच्या घटना घडत असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
ॲड. अमोल मातेले यांचा थेट इशारा:"भावी अभियंते घडवणाऱ्या अशा नामांकित संस्थेत विद्यार्थ्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत, ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे. पालकांकडून भरमसाठ शुल्क वसूल करून विद्यार्थ्यांना साधे पिण्याचे शुद्ध पाणी आणि वीजही दिली जात नसेल, तर हा निधी जातो कुठे? VJTI प्रशासनाने तातडीने या समस्यांचे निवारण केले नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."