एसआयआर मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान पात्र असूनही ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत नोंदविली गेली नाहीत, अशा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ज्या मतदारांची नावे राहून गेली आहेत, त्यांनी फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार म्हणून आपली नोंदणी करून घ्यावी, यासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवश्यक सहकार्य करावे. तसेच एसआयआर मतदार नोंदणी मोहिमेत एकही पात्र मतदार वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
येवला विधानसभा मतदारसंघातील एसआयआर मतदार नोंदणी मोहिमेचा माजी खासदार समीर भुजबळ यांनी आढावा घेतला. येवला संपर्क कार्यालयात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत मतदार यादीचे अद्ययावतीकरण, राहून गेलेल्या मतदारांची नोंदणी तसेच स्थलांतरित व वगळण्यात आलेल्या मतदारांचा शोध घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, भाऊसाहेब भवर, संभाजी पवार, ज्येष्ठ नेते अरुणमामा थोरात, विश्वासराव आहेर, शहराध्यक्ष दत्ता निकम, मोहन शेलार, भाऊसाहेब बोचरे, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, राजेंद्र भांडगे, रतन बोरनारे, सचिन कळमकर, नितीन गायकवाड, विजय खैरनार, संजय पगार, संतोष खैरनार, अल्केश कासलीवाल, भगवान ठोंबरे, नवनाथ काळे, दीपक गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, गणपत कांदळकर,भूषण लाघवे, सुमित थोरात, भागीनाथ पगारे, सचिन सोनवणे, नवनाथ थोरात, मलिक मेंबर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मतदारसंघातून स्थलांतरित झालेले नागरिक, मतदार यादीतून ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत किंवा काही कारणास्तव नोंदणी होऊ शकलेली नाही, अशा नागरिकांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधावा. जुनी आणि नवीन मतदार यादी यांचा बारकाईने अभ्यास करून नावांमधील तफावत तपासावी आणि पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिल्या.
मतदार नोंदणी ही लोकशाही अधिक सक्षम आणि सहभागी बनविण्याची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाला मतदार म्हणून नोंदणी करण्याची संधी मिळावी, यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात, वाडी-वस्त्यांमध्ये आणि शहरातील प्रत्येक भागात जनजागृती करावी, असे आवाहनही समीर भुजबळ यांनी केले. यावेळी बैठकीत मतदारसंघातील विविध भागांतील मतदार नोंदणी प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. तसेच येत्या काळात राहून गेलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.