मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ च्या सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक प्रभावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत हा अहवाल जारी करण्यात आला.
अहवालानुसार, टाटा मुंबई मॅरेथॉनमुळे तब्बल ६६३ कोटी २३ लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारांवर प्रभाव पडला आहे. मात्र, या मॅरेथॉनचा प्रभाव केवळ आर्थिक बाबींपुरता मर्यादित नसून आरोग्य, फिटनेस, सामाजिक समावेशकता आणि शाश्वततेच्या क्षेत्रातही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ड्रीम रनसाठी नोंदणी केली. ड्रीम रनच्या माध्यमातून कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि पहिल्यांदाच मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना धावण्याची संधी मिळते.
दरम्यान, १७ जानेवारी २०२७ रोजी टाटा मुंबई मॅरेथॉनची पुढील आवृत्ती पार पडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक एकतेचा संदेश देत हजारो मुंबईकर धावताना दिसणार आहेत.
‘टाटा मुंबई मॅरेथॉन’चे क्रीडा स्पर्धेतून एका चळवळीत रूपांतर झाले आहे. प्रशासन, महानगरपालिका आणि पोलिसांना एकत्र आणणारा उपक्रम म्हणून सुरू झालेली ही स्पर्धा आज जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मॅरेथॉन बनली आहे. तिचा प्रभाव शर्यतीपलीकडे विस्तारला असून, फिटनेस आणि सक्रिय जीवनशैलीबद्दल अधिक जागरूकता निर्माण करतो. तसेच मुंबईची ऊर्जा, उत्साह आणि भावना जगभरातील प्रेक्षकांसमोर मांडतो. टाटा मुंबई मॅरेथॉन हे खरोखरच शहराला जोडणारे आणि मुंबईला जागतिक क्रीडा नकाशावर स्थान मिळवून देणारे एक व्यासपीठ आहे असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले.