बुलढाणा जिल्ह्यातील धडाडीचे नेते संदीप शेळके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी संदीप शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करा, असे आवाहन केले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे, प्रदेश काँग्रेसच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे उपस्थित होते.
“देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. सर्व कायदे नियम धाब्यावर बसून मनमानी कारभार सुरु असून भाजपाच्या विभाजनकारी राजकारणाला फक्त काँग्रेसचा सर्वसमावेशक विचारच उत्तर देऊ शकतो. काँग्रेसचा विचारच देशाला तारु शकतो म्हणून काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस पक्षात जो काम करेल त्याला मोठी संधी आहे. काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवा, पक्ष संघटना मजबूत करा, काँग्रेस पक्षाशी नवीन पिढीला जोडा”, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले.
'गेट वेल सून, देवेंद्र फडणवीस'..!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कोण हर्षवर्धन सपकाळ पासून बिनडोक सपकाळ, इथपर्यंत देवेंद्र फडणवीसांचा प्रवास झालेला असून मला डोके नाही असे फडणवीस म्हणाले त्य़ाचे आश्चर्य वाटले नाही, कारण शेकडो वर्षापासून बुद्धी ही विशेष जात वर्गाची मक्तेदारी आहे, असा त्यांचा समज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात होते ते ओठावर आले आहे. याच विचाराने छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला होता, या विचाराने बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवले, असे सांगून ‘गेट वेल सून फडणवीस’, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
गॅस तुडवडा होणार नाही याचे नियोजन करा.
गॅस तुटवड्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, LPG गॅसचा तुटवडा हा युद्धामुळे उद्धवला असली तरी सरकारकडे कोणतेच नियोजन नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. उगाच विश्वगुरुचा आव न आणता सर्वांशी चर्चा करून गॅस व इंधनचा तुडवडा होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. गॅस अभावी हॉटेल्स, खानावळी बंद पडणे परवडणारे नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..