शासनाच्या विविध सेवा सामान्य नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि जलद पद्धतीने त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत घाटकोपर येथे आयोजित विशेष महसूल समाधान शिबिराला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी (दिनांक १४ मार्च २०२६) रोजी भेट दिली.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत, कुर्ला तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने, घाटकोपर मधील उपाश्रया लेन स्थित शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या महापौर रितू तावडे या उपस्थित होत्या. नगरसेवक राखी जाधव, नगरसेवक निर्मिती कानडे, नगरसेवक धर्मेश गिरी यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिबिरात नागरिकांशी संवाद साधताना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविणे हीच खरी लोकाभिमुख प्रशासनाची ओळख आहे. ‘महाराजस्व अभियान’ सारख्या उपक्रमांमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय अडचणी दूर होण्यास मोठी मदत होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा उद्देश नागरिकांच्या महसुली संदर्भातील दैनंदिन समस्या, विविध प्रमाणपत्रे व प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढणे हा आहे. मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या विशेष शिबिरांमुळे शासनाच्या सेवा नागरिकांच्या जवळ पोहोचत असून प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होत आहे, असे महापौरांनी नमूद केले.
तसेच, शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी कागदपत्र पडताळणी व पूर्तता (केवायसी) करून घेण्यासाठी एक दालन समाविष्ट करावे, अशी सूचना देखील महापौरांनी केली.
या शिबिरामध्ये नागरिकांना उत्पन्न, रहिवास, जात, नॉन-क्रिमिलेअर आदी विविध दाखले, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांसाठी अर्ज स्वीकृतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
याशिवाय नागरिकांच्या अर्जांची पडताळणी, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन तसेच प्रलंबित प्रकरणांतील त्रुटींची पूर्तता करून घेण्याचे कामकाजही या शिबिरामध्ये करण्यात आले.
यावेळी नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध योजनांचे लाभार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे अनेक शासकीय कामांसाठी नागरिकांना एका ठिकाणीच सुविधा उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.