मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १८ एप्रिल २०२६) आपल्या वाढदिवसानिमित्त औपचारिकतेपलीकडे जाऊन माणुसकीचा स्नेहस्पर्श जपत ‘दी चिल्ड्रेन्स एड सोसायटी’ संचलित बालकल्याण नगरी (मानखुर्द) आणि चेंबूर चिल्ड्रन्स होम येथे अनाथ मुला-मुलींसमवेत वेळ व्यतित करून त्यांना स्नेहभोजन दिले तसेच शालेय उपयोगी बॅगचे वितरण केले.
याप्रसंगी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनींशी अत्यंत आपुलकीने संवाद साधत त्यांच्या आयुष्यात शिक्षणाचे स्थान किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाच्या बळावर आपण स्वप्ने साकार करू शकतो. या सुधार गृह आणि अनाथ आश्रम यातील प्रत्येक मुलगा, मुलगी सक्षम, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक म्हणून घडावी, हीच अपेक्षा आहे. शासन आणि महानगरपालिका त्यांच्या पाठीशी कायम उभे आहे, असे सांगून महापौरांनी सर्व मुला-मुलींशी संवाद साधला.
महापौरांनी मुलींच्या भावना समजून घेत त्यांच्याशी मायेने संवाद साधला, त्यांच्या आकांक्षा जाणून घेतल्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या स्नेहपूर्ण उपस्थितीमुळे विद्यार्थी, विद्यार्थिनींमध्ये आनंद, आत्मविश्वास आणि आपलेपणाची भावना अधिक दृढ झाल्याचे जाणवले.
या कार्यक्रमास ‘दी चिल्ड्रेन्स एड सोसायटी’चे उपमुख्य अधिकारी सतीश बनसोडे, बालकल्याण नगरीच्या प्रशासका रेणुका जाधव, चेंबूर चिल्ड्रन होमचे अधीक्षक तुषार भिलावेकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मानखुर्द) चे प्राचार्य स्वप्निल घाटे तसेच संस्थेतील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
हा उपक्रम अत्यंत भावनिक आणि आनंददायी वातावरणात पार पडला. महापौरांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीसोबतच माणुसकीचा जिव्हाळा अधोरेखित झाला.