आषाढी एकादशीच्या पर्वावर मुंबईतील 'प्रतिपंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे आणि त्यांचे पती राजेश तावडे या दाम्पत्याच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस पारंपरिक व विधिवत महाअभिषेक तसेच महापूजा आज संपन्न झाली. पहाटेच्या सुमारास झालेल्या या सोहळ्यात मंत्रोच्चार आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’ यांच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.
महापूजा संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, आषाढीचे औचित्य साधून संपूर्ण मुंबई महानगराच्या प्रगतीसाठी विठुरायाकडे प्रार्थना केली. पंढरपूरला जाऊन दर्शन घेणे ज्या मुंबईकरांना शक्य होत नाही, त्यांच्यासाठी वडाळ्याचे हे मंदिर म्हणजे ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून श्रद्धेचे केंद्र आहे. आजच्या पवित्र प्रसंगी पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन आपल्या प्रिय मुंबईचा विकास निरंतर वेगाने होत राहो, अशी कामना केली. मुंबईकरांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि शांती नांदो, तसेच मुंबई महानगराच्या प्रगतीचा रथ पुढे नेण्यासाठी व सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी सर्वांना अधिक बळ लाभो, ही प्रार्थना विठुरायाकडे केली, असे महापौरांनी नमूद केले.
या महाअभिषेक सोहळ्यावेळी एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अरुण क्षीरसागर, विठोबा गणपती आणि महादेव मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष उदय दिघे, सचिव प्रशांत म्हात्रे, खजिनदार नितीन म्हात्रे, सभासद उदय म्हात्रे आणि इतर पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
वडाळा येथील श्री विठ्ठल मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा असून, आषाढी एकादशीच्या दिवशी येथे पंढरपूरचे स्वरूप प्राप्त होते. काल मध्यरात्रीपासूनच भक्तांच्या लांब रांगा लागल्या होत्या. टाळ-मृदुंगाचा गजर आणि "जय हरी विठ्ठल" च्या जयघोषात हा भक्तिसोहळा रंगला.
भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, मंदिर विश्वस्त मंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. महापौरांच्या हस्ते झालेल्या महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.