आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुंबईतील सायन येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात दक्षिण मध्य मुंबई काँग्रेसतर्फे भाविकांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
दक्षिण मध्य मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कचरू यादव आणि माजी नगरसेविका ललिता कचरू यादव यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड यांच्या हस्ते भाविकांना तुळशीची रोपे वितरित करण्यात आली.
तुळस ही भारतीय संस्कृतीत पवित्र मानली जाते. औषधी गुणधर्मांसह पर्यावरण संवर्धनातही तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. धार्मिक परंपरेचे जतन करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
यावेळी विठ्ठल-रखुमाईंच्या दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तुळशीची रोपे स्वीकारली. तसेच मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा उपक्रम संपन्न झाला.