पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. पेपरफुटी प्रकरणावर संताप व्यक्त करत विद्यार्थी आज मोर्चा काढला आहे. MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंतराव पाटील म्हणाले आहेत की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाऊ नयेत. MPSC विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने आज विराट आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज बुलंद करण्यात आला आहे. हा महाराष्ट्रातील लाखो मेहनती, प्रामाणिक आणि स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करत दिवस-रात्र अभ्यास करून गरीब विद्यार्थी परीक्षा देतात. अशा परिस्थितीत पेपरफुटी, गैरप्रकार किंवा परीक्षेतील कोणतीही अनियमितता घडल्यास त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते अशी टीका त्यांनी केली.
मेहनत करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे. परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांना कठोरपणे आळा घालून पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे असं त्यांनी म्हटलं आहे तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील असंतोष समजून घेऊन त्यांच्या मागण्यांवर तातडीने आणि सकारात्मक निर्णय घ्या दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यात आल्या पाहिजेत असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.