पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे समोर आले आहे. मानखुर्द-शिवाजीनगर, बैंगणवाडी व गोवंडी परिसरात एक टक्काही नालेसफाई झालेली नसल्याचा आरोप करत नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी पालिकेच्या दाव्याची पोलखोल केली आहे.
पालिकेकडून नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी नालेसफाई पूर्ण झाल्याचे खोटे चित्र उभे केले जात आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी करताना परिसरातील मोठे तसेच छोटे नाले गाळ, कचरा व घाणीने भरलेले असल्याचे दिसून आले. त्यामुळे पालिकेचा शंभर टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. नगरसेविका राजोल पाटील यांनी प्रभाग क्र. १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९ व १४२ या भागातील नाल्यांची पाहणी केली. यावेळी अनेक ठिकाणी नालेसफाईचे काम सुरूही झाले नसल्याचे निदर्शनास आले. पाहणीसाठी आलेल्या पालिका अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी काम सुरू असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पालिकेच्या दाव्याला छेद देणारी असल्याचे राजोल पाटील यांनी सांगितले.
मानखुर्द-शिवाजीनगर परिसरातील एकही नाला असा नाही की ज्याची योग्य प्रकारे सफाई झालेली आहे. पालिका प्रशासन केवळ कागदावर शंभर टक्के नालेसफाई दाखवत असून प्रत्यक्षात नागरिकांना पावसाळ्यात संकटात ढकलण्याचे काम करत आहे, असा आरोप राजोल पाटील यांनी केला. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे यंदाही पावसाळ्यात परिसरात पाणी तुंबण्याची व पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने उर्वरित नालेसफाई पूर्ण करावी, अन्यथा नागरिकांना होणाऱ्या त्रासाला पालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला. या पाहणी दौऱ्यात विभाग संघटिका प्रज्ञा सकपाळ, विधानसभा प्रमुख संजय चव्हाण, मोहम्मद अरशद, अभिजीत चव्हाण, शाखाप्रमुख अर्जुन शिंदे, एकनाथ खराडे, मोहन सोंडगे व शिवाजी झोरे उपस्थित होते.