सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे ट्वीट उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे.
दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड-जेजुरी मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देत जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली तसेच पालखी प्रमुख, पोलीस प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेवून जखमींवर तातडीने व सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्यात यावेत तसेच आवश्यक ती सर्व मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या जखमी वारकऱ्यांची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. राज्यसरकार मृतांच्या कुटुंबियांसह व जखमी वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या.
पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असून सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच जखमी भगिनी लवकर बऱ्या व्हाव्यात अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.