महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुरक्षा रक्षक अजित सिंग यांना कांस्य पदक
भांडुप संकुल येथे कार्यरत अजित सिंग हे ‘रिले रेस’ या क्रीडा प्रकारात ठरले विजेते
पुणे येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकाची अव्वल कामगिरी
●ग्लोबल चक्र न्यूज डेस्क
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलातील सुरक्षा रक्षक अजित सिंग यांनी पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील ‘रिले रेस’ या प्रकारातील धावण्याच्या शर्यतीत अव्वल कामगिरी करीत कांस्य पदक पटकाविले आहे. भांडुप संकुल येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अजित सिंग यांच्या या गौरवामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या गौरवाबद्दल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी व सुरक्षा दल खात्याचे प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी अजित सिंग यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
..
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे अजित सिंग हे सन २०१४ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपली नोकरी सांभाळून ते दररोज व्यायाम करण्यासह धावण्याचा देखील नियमित सराव करीत असतात. अजित सिंग हे गेली १४ वर्षे विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित असून गेल्यावर्षी लखनौ येथे झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत त्यांनी रौप्य पदक पटकाविले होते. या व्यतिरिक्तही इतर अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. श्री. सिंग यांनी आपल्या या यशाचे श्रेय कुटुंबियांसोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलातील वरिष्ठांना व सहका-यांना दिले आहे.