हैडलाइन

बालचित्रकला स्पर्धा म्हणजे प्रेरणादायी कलासंस्कार घडविणारा स्तुत्य उपक्रम

माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा म्हणजे प्रेरणादायी आणि कलासंस्कार घडविणारा स्तुत्य उपक्रम आहे. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. त्यामुळे अशा स्पर्धा आयोजित करून बृहन्मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देते, असे मत शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी व्यक्त केले.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दिनांक १ मार्च २०२६ रोजी बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ५१ ठिकाणी आयोजित या स्पर्धेमध्ये पाच गटांत एकूण ८६ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिनांक २४ मार्च २०२६ रोजी घोषित केला होता. यंदाचे हे स्पर्धेचे १७ वे वर्षे होते. 

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात या स्पर्धेतील विजेत्या ६५ विद्यार्थ्यांना आज (दिनांक ७ एप्रिल २०२६) पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी श्रीमती शिरवडकर बोलत होत्या. 


समाजवादी पक्षाच्या गटनेत्या श्रीमती अमरीन अब्रहानी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. किर्तीवर्धन किरतकुडवे, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी, कला अकादमीचे प्राचार्य श्री. दिनकर पवार, संबंधित कला शिक्षक यावेळी उपस्थित होते. 

श्रीमती राजेश्री शिरवडकर म्हणाल्या की, चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या मनातील सुख-दु:ख, आनंद कागदावर चितारता येतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार होते. शाब्दीक फटकाऱ्यांसह कुंचल्यातूनही त्यांचे फटकारे उमटत असे. त्यामुळे कोणतेही चित्र साकारत असताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा, असा सल्लाही श्रीमती शिरवडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. 


शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. किर्तीवर्धन किरतकुडवे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेविषयी माहिती दिली. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन पेंग्विन सभागृहाबाहेर भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनालाही श्रीमती शिरवडकर आणि मान्यवरांनी भेट दिली. श्रीमती आरती खेर यांनी आभार मानले. कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखविणारी महानगरपालिकेच्या विक्रोळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेतील इयत्ता नववीची विद्यार्थीनी कुमारी मृणाल काळे हिच्या सूत्रसंचालन कौशल्याचे कौतुक करीत मान्यवरांनी तिचाही यावेळी सत्कार केला. 

प्रत्येक गटातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रत्येकी २० हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांस १५ हजार रुपये तसेच पदक आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. प्रत्येक गटातील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये आणि पदक तसेच प्रशस्तिपत्र देण्यात आले. तसेच विभाग स्तरावर प्रत्येक गटात ५ याप्रमाणे २५ अशी एकूण २५ प्रशासकीय विभागांमध्ये ६२५ उत्तम चित्रांना प्रत्येकी ५०० रुपयांचे रोख पारितोषिके आणि पदक देण्यात आले. 



Most Popular News of this Week

वाढदिवसाचा स्नेहस्पर्श -...

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १८ एप्रिल २०२६) आपल्या...

मुंबई अग्निशमन दलात सेवा...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात सेवा बजावताना आजवर शहीद...

अग्निशमन सेवा दिनानिमित्त...

आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांचे जीव वाचविण्यासाठी अग्निशमनाचे कार्य...

६२व्या इन्स्टॉलेशन सोहळ्यात...

शनिवारी सायंकाळी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार हे केवळ एका नेतृत्वबदलाचे...