अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले असून हा संघर्ष भाजप विरुद्ध देशभक्त असा आहे,’ असे प्रतिपादन शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील विजयी मेळाव्यात केले. तर, ‘जेन-झीने सरकारच्या झिंज्याच उपटल्या,’ अशी तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. या मेळाव्यात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पेपरफुटीच्या मुद्द्यावर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उबाठा आणि मनसेने रविवारी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी राजीनामा दिल्यानंतर, मोर्चाऐवजी शिवाजी पार्क परिसरात तिरंगा विजयी जल्लोष सभा झाली.
‘जात, धर्म, पक्ष विसरून आपण देशभक्त भारतीय म्हणून इथे जमला आहात. ही गर्दी विष्णूचा अवतार आहे. नरेंद्र मोदी यांनी आता तरी देशाकडे लक्ष द्यावे. तुमचे मंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत; त्यांना देशाचे काम करायला सांगा,’ असे उद्धव म्हणाले. ‘अर्थमंत्री घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत; पेपरफुटीचे फायदे सांगतात. संरक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी पुढे आले. खड्डा उर्फ रस्ता मंत्री इथेनॉलवर बोलतात. आत्महत्याग्रस्तांच्या वेदना आम्ही विसरणार नाही,’ असे ते म्हणाले.