मुबई, दि. २७ मे - विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा सखोल अभ्यास करून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'भारतीय संविधानाची उद्देशिका' ग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
आजच्या विद्यार्थ्यांमधून उद्याचे आदर्श नागरिक घडविण्याचा शिक्षकांचा प्रयत्न असतो. हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेतील उद्देशिकेचा अभ्यास विद्यार्थ्यानी अधिक जागरूकपणे केला पाहिजे, शिक्षकांनी तो करून घेतला पाहिजे. कोरोनाकाळात उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य वाढविण्याबरोबरच आपल्या आरोग्य संवर्धनाचीही काळजी घ्यावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
प्रतिबंधक नियमांचं पालन करून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण सर्वजण लवकरच यशस्वी होऊ, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी लेखक, संपादक आणि प्रकाशकांचे विशेष कौतुक केले. प्रा. स्वप्नील सोनवणे यांनी अतिशय कल्पकतेने या ग्रंथाची मांडणी केली असल्याचे गौरवोद्गार धनंजय मुंडे यांनी काढले. प्रत्येक घरात हा ग्रंथ नेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
संपादक विठ्ठल मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्वप्नील सोनवणे यांनी आभार मानले. या प्रकाशन सोहळ्यासाठी बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी, राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष तथा गटनेता कॅप्टन आशिष दामले, नगरसेवक प्रभाकर पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राम लिये उपस्थित होते.
या ग्रंथाचे लेखक प्रा.स्वप्नील सोनवणे, संपादक विठ्ठल मोरे तर प्रकाशक प्रा.संतोष राणे हे आहेत.