विधानसभा अध्यक्ष सभागृह चालवत होते का भाजपाचे कार्यालय?
नागपूर: हिवाळी अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे होत असते परंतु या अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून गृहमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री पदही त्यांच्याकडेच आहे. विदर्भातील धान, संत्रा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास होता पण तसे झाले नाही. पीकविम्यावर सरकार बोललेच नाही. ५० रुपये ५ रुपयांचा चेक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळतो हे संतापजनक आहे. अधिवेशनातून सरकारने ठोस काहीही दिले नाही, नागपूरचे अधिवेशन हे शेतकरी, तरुणवर्ग, महिला, छोटे, मध्यम व्यापारी सर्व घटकांच्या तोंडाला पाने पुसरणारे ठरले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
महाराष्ट्राला एक उज्ज्वल परंपरा आहे पण शिंदे-फडणवीस सरकारने खोक्याने विकत घेण्याची परंपरा महाराष्ट्रात सुरु केली आहे. या सरकारने राज्याची प्रतिमा कलंकित केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात आणखी २० आमदार विकत घेऊन बहुमत सिद्ध करु. सत्तेची एवढी गुर्मी चढली आहे की तुम्ही कोणालाही विकत घ्यायला निघाले. सीमाबांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कर्नाटकला त्यांच्याच भाषेत सुनावण्याची संधीही या सरकारने गमावली.